Saturday, October 10, 2015

आणि मला वाढदिवस सापडला

 जन्मतारीख एक खोज 

आमच्या लहानपणी वाढदिवस साजरा करणे हा प्रकारच माहीत नव्हता. बऱ्यापैकी पैसे असणाऱ्यांकडे जाऊळाचे किंवा बारशांचे कार्यक्रम गावजेवण देऊन साजरे केले जात, पण अशी घरे मोजकीच असत. पण तेवढाच काय तो उत्सव,त्यापलिकडे जाऊन  दरवर्षी वाढदिवस साजरा केला जात नसे.   अख्या गावात कुणाचाच वाढदिवस नसल्याने त्याची कुणाला खंतही नसे. बरोबरच्या मुलांपैकी कुणालाच आपला वाढदिवस कधी याची आठवणही नसे.

पुढे कोल्हापूरला गेल्यावर बरेच लोक आपले वाढदिवस साजरे करतात आणि प्रत्येकाचा तो एक व्यक्तिगत  वार्षिक सण असतो हे कळले. ज्याचा वाढदिवस असेल त्याला पुष्पगुचच्छ देऊन शुभेच्छा देणे, केक कापणे, त्याच्या तोंडाला केक माखणे, मित्रासोबत हॉटेलात पार्टी करणे  असे प्रकार शहरात सर्रास सुरू झाले होते. बाकीचे खिशाला परवडणारे नसले तरी,  किमान चार लोकांना सांगता येईल असा अधिकृत असा आपलाही एक वाढदिवस असायला हवा असे वाटायला लागले. त्याआधी जन्मतारीख हा विषय तसा दूर्लक्षितच होता. शाळेच्या रजिस्टरवर आणि नंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यापुरते त्याचे अस्तित्व होते. ती शोधूल पाहिली तर ती होती एक सहा एकोणीसशे एकोणऐंशी. थोडा आणखी शोध घेतल्या नंतर कळले की गावच्या शाळेत माझ्या वर्गात नऊजण होते. त्या पैकी आठ जणांची जन्मतारीख हीच होती. त्याकाळी जास्तीत जास्त पाचशे ते सहाशे लोकसंख्येच्या आमच्या गावात एका दिवशी आठ मुले जन्माला येणे केवळ अश्यक्य होते. मग हा चमत्कार कसा झाला. तो चमत्कार केला होता आमच्या चिले नावाच्या गुरूजींनी. त्यांनी आपल्या लेखणींच्या एका फटकाऱ्यात हा चुकीचा इतिहास तयार केला होता. गावातल्या मुलांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या एकशिक्षकी शाळेचे ते कित्येक वर्षे एकमेव आधारस्तंभ होते. त्यांनी ही परंपरा अनेक वर्ष जोपासली त्यामुळे गावातली पहिल्यांदा शिकणारी सबंध पिढी एक जूनलाच जन्मल्याचे दस्तऐवज तयार झाले.

आता हा इतिहास पुसून खऱ्या इतिहास समोर आणणे गरजेचे होते, नव्हे ते आपले कर्तव्यच आहे. असे समजून त्या काळातले संदर्भ शोधायला सुरूवात केली. त्या काळात बाहेरच्या जगाची नुकतीच ओळख होत होतीथोरा मोठ्यांची चरीत्र आणि त्यांचे विचार वाचून आपणही असे काहीतरी भव्य काम करू असा विश्वास होता. कारण वयानुसार निरागसता आणि प्रचंड उमेद होती. आता बॅंकेचे हप्ते सुरू रहावेत म्हणून नोकरी टिकवण्याची कसरत करत राहणे या पलिकडे काही दिव्य काम झाले नाही तो  भाग वेगळा. पण त्या समजुतीतून चुकून काही लोकोत्तर काम हातून झालंच तर नंतर जन्मतारखेचा वाद नको म्हणून खरी जन्मतारीख आपणच शोधून ठेवलेली बरी म्हणूनही खरी जन्मतारीख शोधायला हवी होती. आता पस्तिशी गाठल्यानंतर आपली झेप कुठपर्यंत आहे हे कळून चुकलेय. काहीच नाही मिळाले की अनुभव नक्की मिळतो  असं म्हणतात. त्यामुळे आयुष्य  खूप अनुभव संपन्न झालेय.

तर मुद्दा असा की, खरी जन्मतारीख शोधण्याची मोहीम सुरू झाली. शाळेतून कळलं की, इथं सगळेच कष्टकरी, थोड्याफार शेतीशी आणि निसर्गाशी झगडणारे, मुलांच्या जन्माची नोंद करणे, जन्मदाखला काढणे असले काही त्यांच्या गावीही नसायचे. ही मुले जेव्हा शाळेत यायची त्यावेळी आजच्यासारखी जन्मदाखल्याची अट नव्हती. पण शाळेत घालण्याचे वय तरी पूर्ण व्हायला हवे. शाळा जून मध्ये सुरू होतात. म्हणून ज्यावर्षी मुलगा शाळेत येईल त्या पासून बरोबर सहा वर्षे मागे जावून त्या वर्षीची एक जून तारीख ही त्या मुलाची जन्म तारीख ठरवून ती त्याला कायमची चिकटवून टाकायची हा मार्ग मास्तरांनी अवलंबला होता. कारण पालकांकडे जन्मदाखला मागणे किंवा जन्म तारीख विचारण्याचा काय उपयोग नव्हता हे त्यांनी ओळखले होते, मुल शाळेत येणे हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. अशाच पंच्याऐंशीच्या बॅचमध्ये शाळेत गेल्याने मला एकोणऐंशीची एक जून ही जन्मतारीख मिळाली.

आता खरी तारीख कोणती हा प्रश्नच होता, आईला विचारल्यावर तिने तिच्या आमावस्या पोर्णिमेच्या कॅलेंडर नुसार, दसऱ्याच्या आमावस्येला माझा जन्म झाल्याचे सांगितले. पण साल कोणते हा प्रश्नच होता. त्यावेळी आईने सांगितले की माझ्या जन्मानंतर खऱ्या जन्म तारखेचा अनुषंगिक पुरावा मिळण्याची एक होती. ती म्हणजे आमच्या गावातल्या भटजीने जन्मवेळ पाहिल्यानंतर लिहून दिलेला कागद. पण तो कागद घरापर्यंत पोहचायच्या आधीच हरवला होता आणि पुन्हा तो काढायला सवड मिळाली नव्हती. त्यामुळे ही शक्यताही मावळली . मग त्यावर्षी गावात झालेल्या ठळक घडामोडींची जसे त्यावर्षी मरण पावलेली माणसे, झालेली लग्ने यांची संगती लावून 1980 हे साल मिळाले. मग तारीख कोणती. कोल्हापूरात मी गावातल्या मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत राहत होतो. तिथे शेजारच्या खोलीत एक पुरोहित राहत होता. सोलापूर भागातून आलेला हा माणूस सत्यनारायण सांगणे वगैरे काम करायचा जेव्हा काम नसेल त्यावेळी एक तर झोपायचा किंवा आमच्याशी गप्पा मारायचा. कुंडल्या तयार करून देणे हा ही त्याचा जोडधंदा होता हे नंतर कळले, त्याने माझी कुंडली करण्याचा आग्रह धरला ते ही कोणताही मोबदला न घेता. त्यावेळी त्याला माझी समस्या सांगितली. त्यावर्षीच्या दसऱ्याच्या आमावस्येला कोणती तारीख होती हे शोधून काढणे त्याच्या दृष्टीने बाये हात का खेल होता. त्याने तात्काळ त्याचे पंचांग पाहिले आणि ती तारीख नऊ आक्टोबर असल्याचे लगेचच सांगून टाकले. पण जन्माची वेळ निश्चित माहित नसल्याने त्याने अंदाजाने कुंडली तयार केली. मला साडेसाती असून कुठल्यातरी योगाची  शांती करावी लागेल असा उपाय सांगितला. अशा प्रकारे खरी जन्मतारीख मिळाली आणि मला साडेसाती लागली. साडेसातीवाल्यांचे एक बरे असते कठीण काळ कधी तरी संपणार अशी आशा तरी असते.  अर्थात मी पत्रकारीतेमध्ये येऊन ती आशाच संपवून टाकत ती भविष्यवाणी खोटी ठरवली.

पुढे आणखी एक समस्या होती दाेन तारखामध्ये तब्बल सतरा महिन्यांचा फरक होता आणि   या नव्याने शोधलेल्या  जन्म तारखेला सिद्ध करण्याचा कोणताही ठोस पुरावा माझ्याकडे नव्हता. त्यामुळे ती रीतसर बदलून घेता आली नाही. तरीही त्यानंतर कागदावर जूनीच जन्मतारीख ठेवून नवीन जन्मतारीख अनौपचारीकपणे वापरायला सुरूवात केली. मात्र गुरुजींनी चिकटवलेली एक जून कायमची पुसून टाकता नाही आली. त्या तारखेनुसार माझ्या जन्माच्या आधीच सतरा महिने रेकार्डवर मी अस्तित्वात होतो. त्यामुळे  माझी सरकारी नोकरीची पात्रता वेळे आधीच संपली आणि नोकरी करत राहिलो तर सतरा महिने आधीच रिटायर्ड होणार. म्हणतात गुरूजनांची माणसाच्या आयुष्यावर खुप खोलवर छाप असते. पण आमच्या गुरुजींनी जी छाप सो़डलीय तीला जगात दूसरी तोड नाहीे. त्यांनी दिलेली जन्मतारीख जी चिकटलीय ती कायमचीच. खरी जन्मतारीख शोधून मी काय मिळवले माहित नाही ती शोधणे आणि कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसताना ती बदलून मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारणे कितपत योग्य पण माहित नाही. पण मी गेले अनेक वर्षे ते करत आलोय.   त्यामुळे थोडासा अपराध भाव आहेच. पण आपली जन्मतारीख अशी मोघम नसली पाहिजे हा अट्टाहास मी पूर्ण करतोय.  आई वडिलांनी ठेवलेली नावे ओल्ड फॅशनची म्हणून जसे  दगडूचे रॉकी या चालीवर परस्पर नामांतर करणाऱ्या अनेकजणांना मी ओळखतो. त्या तुलनेत एक जूनची खोटी जन्मतारीख बदलण्याचा माझा गुन्हा म्हणजे खुपच सौम्य प्रकारातला आहे. 
 
कागदावर एक जूनच असल्याने एचआरच्या बर्थ डे मेलिंग लीस्टमध्ये माझा वाढदिवस एक जूनलाच असतो. सोशल मिडीयामुळे कळले की असे एक जूनवाले खूप लोक आहेत. त्यांनीही आपली खरी जन्मतारीख जरूर शोधावी. कारण नंतर नसते वाद नकोत. ऩुकत्याच झालेल्या वाढदिवसाला अपेक्षेपेक्षा जास्त मित्रांनी शुभेच्छा दिल्या. सोशल मिडीयाची कृपा दुसरे काय. आपल्या असण्याची दखल एवढे लोक घेतायत ही जगण्याची आसक्ती वाढवणारी आणि निराशा दूर करणारी बाब होती. शुभेच्छा स्वीकारताना अपराध भाव होता. एक तर आठवणीने सगळ्यांना शुभेच्छा देणे काही मला जमत नाही. त्यात हे  जन्मतारीख प्रकरण. हे तर आता क्लीयर झालेच आहे. य़ेणाऱ्या काळात सर्वांना आठवणीने शुभेच्छा द्यायच्या आहेत. बघूयात किती जमतेय.....

No comments: