Tuesday, July 5, 2016

आपण चुकीला चूक कधी म्हणणार

 बांग्लादेश मध्ये झालेला ताजा  हल्ला असो की अमेरिकेत नुकताच झालेला गोळीबार,  जगभरातले दहशतवादी हल्ले जगाचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण करत आहेत. भारतातल्या स्वतःला पुरोगामी आणि सेक्युलर मानणाऱ्या लोकांची यामुळे दिवसेंदिवस  अधिकच अडचण होत चालली आहे. दारिद्र्य, अमेरिका आणि पाश्चात्य देशांची कारस्थाने, कथित अन्यायाचे परिमार्जन, अमेरिकेतले शस्त्रास्त्र कायदे,  बेरोजगारी अशी वेगवेगळी करणे देत  पळवाटा शोधण्याचे आणि दहशतवाद्यांना पाठीशी  घालण्याचे प्रकार या लोकांनी बंद केले पाहिजे. कारण दहशतवादाला धर्म नसतो. धर्माशी त्यांचा काही संबंध नाही ही टेप जुनी झाली आहे या आणि ती ऐकण्याचा लोकांना कंटाळा आला आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे वेवेगळी करणे देऊन ज्या प्रवृत्तीनवर पांघरून घालण्याचा प्रयत्न हे लोक करतात त्यांच्या कारवायांवर या विद्वानांचे काहीही नियंत्रण राहत नाही ही  त्यांची सगळ्यात मोठी समस्या आहे. ज्या कृती आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत त्याला डिफेन्ड करण्याचा धोका हे लोक का पत्करतात हा खरा प्रश्न आहे. 

एक बाजूला असलेल्या कट्टरतेचा परिणाम इतर समाज गटावर होतो आहे. त्यामुळे विरुद्ध बाजूची कट्टरता वाढीस लागत आहे. त्यामध्ये स्वतःला निपक्षपाती समजणाऱ्या या  लोकांची न घर का ना घाट का अशी अवस्था होत आहे. SECULAR  लोकांची एकंदर मांडणी आणि आम्हीच काय ते शहाणे असा अविर्भाव बघता ते आपल्या पूर्वग्रहांशी घट्ट चिकटून आहेत. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या प्रचंड उलथापालथीचा त्यांच्यावर काही परिणाम होताना दिसत  नाही. प्रत्यक्षात अनुभवास येणाऱ्या समस्यांचे सामान्य माणूस प्रॅक्टिकल सोल्युशन शोधतोय तर हे विचारवंत घडीघडी त्यांच्या पोथ्या उघडून त्यातले सोल्युशन सांगत बसतात अर्थात त्यांच्याकडे कुणी लक्ष्य देत नाही. त्यामुळे हा वर्ग झपाट्याने इरेलेव्हंट होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य   माणूस आणि त्यांच्यात दृष्टिकोनात प्रचंड अंतर पडू लागले आहे. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा काही थांबत नसतो. पण कोंबडे झाकून सूर्याला  उगवण्यापासून रोखण्याचा या लोकांचा व्यर्थ खटाटोप सुरू आहे. 

कट्टरतावाद परस्पर पूरक असतो वेगवेगळी करणे देऊन एक प्रकारच्या कट्टरतावादावर पांघरून घालण्याच्या प्रकारामुळे दुसऱ्या प्रकारचा कट्टरतावाद डोके वर काढत असतो.  भारतामध्ये नेमके तेच झाले आहे. त्यामुळे पांघरून घालणारे आणि आम्ही म्हणू तेच योग्य म्हणणारे लोक याला जबाबदार असतात, पण दुर्दैवाने याचे त्यांना भान राहिलेले नाही.  इतके दिवस त्यांनी इतका एकारलेपणा स्वीकारला आहे की  एकाच प्रकारच्या कट्टरतावादाला   फक्त कट्टरतावाद मानायचे आणि दुसऱ्या प्रकाराला सामाजिक समस्या मानून पांघरून घालायचे असा दृष्टिकोन त्यांनी  स्वीकारल्यामुळे सामान्य माणसाच्या उघड्या डोळ्यांनी दिसणारे सत्य त्यांना दिसत नाही.

 खरे तर योग्य अयोग्य सांगणारा विवेकी आवाज समाजात असण्याची गरज असते. तो आवाज प्रवाहपतित होणे  किंवा सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचायला लागणे ही त्या समाजासाठी धोक्याची घंटा असते . कारण  त्यांची विश्वासार्हता धोक्यात धोक्यात येणे म्हणजे समाजात विवेकी आवाज लोप पावणे असते,  त्याचा त्या समाजावर दूरगामी परिणाम होत असतो . आपल्याकडे नेमके हेच झाले आहे.   त्यामुळे जगभरातील सेक्युलर पुरोगाम्याप्रमाणे  भारतातले त्यांचे पाठीराखे ही समस्या सोडवण्यासाठी कुचकामी झाले आहेत. कारण त्यांना ही समस्या समस्याच वाटत नाही. ते त्यासाठी एक्सक्यूजेस शोधत बसतात  त्यामुळे दहशतवादाचे बळी ठरणाऱ्या लोकांपेक्षा  आणि दहशतवादी कृत्यामुळे बदनामीला तोंड देणाऱ्या समाजातूनच असा विवेकी आवाज येणे हाच  काय तो आशेचा किरण आहे. तसा  आवाज बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन, किंवा कॅनडास्थित पाकिस्तानी लेखक तारिक फतेह यांच्या रूपाने ऐकू येतो आहे. पण बॉम्बच्या धमाक्याच्या आवाजात तो क्षीण  वाटतो आहे. तसा आवाज बुलंद करत राहणे ज्या समाजाची आणि धर्माची बदनामी होतेय त्यांनी अशा दहशतवादी वृत्तीना समाजातून हद्दपार करणे, हा यावरच उपाय आहे.  

 त्यासाठी चुकीला चूक म्हणायची मानसिक तयारी असायला पाहिजे, तीच आपल्याकडे असत नाही ही मोठी समस्या आहे , चुकीला चूक म्हणण्याऐवजी आपले आणि आपल्या गॅंगमध्ये ( समविचारी)  असणाऱ्यांचे सगळेच बरोबर आणि विरोधी गॅंगचे सगळेच चूक असे सुरू असते.  त्यावेळी आपल्या गँगच्या लोकांच्या चुकांवर  पांघरून घालायची चढाओढ सुरू होते . असे  झाले की तुम्ही सत्य जरी बोललात तरी  तरी त्यावर लोक विश्वास ठेवायला धजावात नाहीत.  सामान्य माणूस असा एकारलेला विचार करत नाही. तो चुकीला चूक म्हणायला कचरत नाही. विचारवंतांच्या जगात तुम्ही कन्हैयाला विरोध केला तर तुम्हाला थेट विचारवंतांवर हल्ले करणाऱ्या दुसऱ्या गॅंगचे  पाठीराखे ठरवले जाऊ शकते. पण एकाचवेळी दोन्ही प्रवृत्तीची चीड असणारे  लोक असू शकतात आणि आपल्या समाजात असेच विवेक शाबूत असणारे बहुसंख्य लोक आहेत. त्यांची मते म्यानिप्युलेट करण्यासाठी यंत्रणा राबवल्या जातात. या यंत्रणेत भाग घेणारे एकाच बाजूने बघतात त्यामुळे सामान्य माणूस जो त्यांचा टार्गेट ऑडियन्स असतो त्यांना काही एकाच बाजूने बघण्याचे कंपल्शन असत नाही, त्यामुळेच त्यांचा विवेक जागा असतो.  

No comments: