Tuesday, January 5, 2016

हे युद्ध नाही तर काय आहे.

पठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने आपल्या देशात कुणीही सुरक्षित नाही. कुठल्याही शहरात अतिशय कडेकोट बंदोबस्त भेदून अतिरेकी कुठेही घुसू शकतात, हे सिध्द केले आहे. असे हल्ले परतवून लावताना आपल्या सुरक्षा दलातील जवानांनी कितीही पराक्रम केला  आणि बलिदान दिले तरी असे हल्ले देशाच्या  मनोबलावर परिणाम करत असतात. अतिरेक्यांना नेमका तोच परिणाम हवा असतो.  अशा हल्ल्याने निर्माण झालेल्या प्रश्नांची आपण  सोपी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यातले  सगळ्यात सोपे उत्तर म्हणजे कुणाच्यातरी माथ्यावर  त्याचे  खापर फोडणे, एकदा बळीचा बकरा शोधला म्हणजे आपले काम संपते, तसे एकदा केले की अवघड प्रश्नांची उत्तरे त्या बळीच्या बकर्यांना द्यावी लागतात.  मग ती वेगळी कवायत सुरू राहते. त्याच्यात आपण फक्त मुक प्रेक्षक असतो. मग आपण आपआपल्या कामाला लागतो, अधून मधून शहिदांचे फोटो सोशल मिडीयावर सर्क्यूलेट करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतो.

 हे सर्व करत असताना आपला देश  अतिरेकी हल्ल्यांचे वाढते  लक्ष्य का होतोय, हे कधीपर्यंत चालणार आहे. . अशा प्रकारचे हल्ले घडवून आणण्यासाठी आत्मघातकी माणसे कशी तयार होतात. त्यांच्यामध्ये एवढा पराकोटीचा द्वेश आणि असहिष्णुता येते कुठून?  या प्रश्नांचा शोध आपल्याला घ्यावासा वा़टत नाही.  आत्मघातकी हल्ल्यासाठी आलेल्या माणसाला मरणाची भिती नसते. त्यामुळे  की त्याला जीवंतपणी थांबवणे अशक्य असते. फक्त मरणे हा त्यांचा हेतू नसतो तर मरताना जास्तीत जास्त विध्वंस करणे  हा त्यांचा हेतू असतो. तर सुरक्षा दलापुढे जीवित वित्त हानी कमीत कमी ठेवून त्यांचा खात्मा करण्याचे आव्हान असते.

 देशाची संरक्षण सिध्दता  ही दिर्घकाळ चालणारी प्रक्रिया असेत. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीसोबत आर्थिक ताकद आणि स्थैर्य आवश्यक असते.  भारतासारख्या खंडप्राय देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचे आधुनकीकरण अतिशय वेळखाऊ आणि जिकीरीचे असते. त्यासाठी दुरदृष्टीचे धोरणे राबवणे आवश्यक असते. याच्या तुलनेत अतिरेकी संघटनांना आत्याधुनिक शस्त्रास्त्र सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळेच आपल्या सुरक्षा दलांना विषम परिस्थितीत  अतिरेक्याचा सामना करावा लागतो.  2008 मधला मुंबई  हल्ला, गुरदासपूरचा हल्ला आणि कालच्या पठाणकोटच्या हल्ल्यातही  हेच दिसून आले. प्रत्येक हल्ल्यानंतर शहीदांना श्रद्धांजली वाहणे आणि सरकारच्या माथ्यावर खापर फोडणे एवढेच फक्त आपल्या  हाती उरले आहे.

पाकिस्तानला एकदाचा धडा शिकवायला हवा असा टोकाचा  युक्तीवाद आपण सातत्याने करत असतो. मोदी यांनी सत्तेवर येण्या आधी आणि भाजपने विरोधी पक्षात असताना तत्कालीन सरकारला याच मुद्द्यावर धारेवर धरले होते. आपण पाकिस्तानच्या बाबतीत एवढे बचावात्मक धोरण का स्विकारतो. असा कट्टर राष्ट्रप्रेमीचा  सवाल असचो . आतरराष्ट्रीय संबंध इतक्या तडकाफडकी हाताळता येत नसतात, त्यामध्ये अनेक गुंतागुंतींचा समावेश असतो, अतिरेकी संघटना जशा प्रकारे काम करतात तशा पद्धतीने देशाला काम करता येत नाही. भारताची कोणतीही तीव्र प्रतिक्रिया  दोन्ही देशात अणूयुद्धाचा धोका निर्माण करु शकते. म्हणून पाकिस्तानशी संबंध ही काळजीपुर्वक हाताळायची बाब होऊन बसली आहे.

 आंतरराष़्ट्रीय दबावापुढे  भारत कोणताही  आततायी निर्णय घेऊ शकत नाही, हे अतिरेकी प्रवृत्तीना चांगले माहित आहे. हीच आपल्या देशाची कमजोर बाजू  आणि अतिरेक्यांची जमेची बाजू ठरत आहे.   भारताबरोबर निर्णायक पारंपारिक युध्दात टिकू शकत नाही याची जाणीव असल्यानेच पाकिस्तान अशा छुप्या युध्दाचा अवलंब करत आहे. पाकिस्तानबरोबर एकदाचे युध्द करुन काही तो सोक्षमोक्ष लावावा असे आपण अनेकदा म्हणत असतो. पण हे आपल्या पलायनवादी मानसिकतेचे लक्षण आहे. कारण आपल्याला त्यातून लगेच सुटका पाहिजे आहे.  पण आज जे चालू आहे ते युध्दच आहे या वास्तवाचा आपण विचार करत नाही. हे असे युद्ध आहे की त्यातून क्षणात सुटका करून घेण्याची कोणतीही जादू आजतरी उपलब्ध नाही.   प्रत्यक्ष हल्ल्या बरोबरच हे मानसशास्त्रीय युध्द आहे, माहिती युध्द आहे. अशा युद्धात राष्ट्रांच्या संयमाची आणि मनोबलाची  परीक्षा  होत असते. या युध्दांतून एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावणे शक्य होत नसते. हे दिर्घकाळ अतिशय संयमाने लढावयाचे युध्द असते.

 जादूच्या कांडी फिरल्यासारखे दहशतवादी हल्ले बंद होऊ शकत नाहीत. काही तरी करा  एकदाचे हे बंद करा म्हणणे म्हणजे ही जबाबदारी सरकारवर आणि सुरक्षा दलावर टाकून वास्तवापासून दूर पळण्याची हा प्रकार आहे.  आपल्याला शांतता  पाहिजे,  पण त्यासाठी थोडीही तोशीष आपल्याला नको आहे. जराही त्रास झाला तरी आपण सत्ता उलथवून टाकायला सज्ज होतो, अशी अधीर जनता असेल तर, लोकशाही व्यवस्थेचा  विघातक शक्ती आपल्या फायद्यासाठी उपयोग करुन घेऊ शकतात.  राजकीय स्थैर्य या शक्तींच्या वाटेत  अडथळे उभे करत असेल तर सरकार विषयी नाराजी निर्माण करून अस्थिरता आणायचा प्रयत्न होतो.  अशावेळी  पलायनवाद कामाचा नसतो,  कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करायची तयारी ठेवली तरच या शक्तींना परास्त करता येत असते. युद्धाला सामोरे जाणे हा एकमेव पर्याय आपल्यासमोर शिल्लक उरतो.  त्यामध्ये प्रत्यक्ष लढणार्या सैनिका इतकीच तुमची आमची भूमिका महत्त्वाची असते.

 शांततेसाठीच्या सर्व पर्यायांचा अवलंब करतानाच सातत्याने हल्ले होतच राहणार याची जाणीव ठेवण्याची ,त्यातून होणारे नुकसान कसे कमीत कमी होईल अशा रितीने संरक्षण सिद्धता करण्याची गरज आहे.  हल्ले वाढले की मग आपण सोपा मार्ग म्हणून निवडणुकीत सरकार बदलून बघतो. पण सरकार बदलल्याने व्यवस्थेत आणि अतिरेकी मानसिकतेत कोणताही फरक पडत नसतो. म्हणूनच  कठीण काळात देशाने एकजूटीने उभे राहण्याची गरज असते, पण, आपल्याकडे राजकीय पोळ्या शेकण्याचे काम सतत सुरू असते हे दुर्दैवी वास्तव आहे. आस्थिरता आल्यास सरकारने सुरु केलेल्या संरक्षण विषयक सुधारणांना खो बसतो. आर्थिक सुधारणा रोखल्या जातात,   आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या कुटनितीला शह बसतो.   अशा प्रकारे आपले अंतिम उद्दीष्टे  साध्य करण्यासाठी पोषक  वातावरण निर्माण करणे  असा व्यापक कार्यक्रम दहशतवादी संघटना राबवत असतात.

 भारताचा जस जसा विकास होईल तसा अशा छुप्या युद्धाचा धोका वाढत जाणार आहे. त्यामुळे दहशतवादी छुप्या युद्धाला फुलप्रुफ यंत्रणा उभी करणे जवळपास अशक्य झाले आहे. याची जाणीव आपल्याला होण्याची गरज निर्माण झाली आहे. देशांतर्गत राजकारणात प्रतिपक्षावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात  आपण देशाच्या शत्रुंना तर आपण मदत करत नाही ना याचे भानही  ठेवायला पाहिजे. आज दहशतवाद हा असाध्य रोग झाला आहे. तो पूर्णपणे बरा होऊ शकेल असा अँटीडोट आज तरी उपलब्ध नाही. पण त्याच्या सोबत जगण्याची सवय लावून घेण्याची वेळ आली आहे.  एखाद्या असाध्य रोगाचे जंतू जे्व्हा शरीरात असतात तेव्हा जशी शरीराची प्रतिकार क्षमता वाढवणे हाच एकमेव उपाय उरतो तसा एकमेव उपाय आपल्यासमोर राहिला आहे. त्यामुळे दहशतवादाच्यासोबत जगत असताना त्याच्याशी विविध पातळ्यांवर दोन हात करण्याची जेवढी प्रतिकार क्षमता आपल्यामध्ये वाढणार तेवढी राष्ट्र म्हणून सर्व्हायवलची शक्यता अधिक राहणार आहे.  त्यामुळे युद्ध फक्त सीमेवरच खेळले जाते या मानसिकतेतून बाहेर पडून युद्ध तुमच्या आमच्या दारात आले आहे,  हे सत्य आपण स्वीकारले पाहिजे.  आणि आपल्या सुरक्षेची जबाबदारी फक्त सैनिकांची नाही तर प्रत्येकाने सदैव युद्धमान राहण्याची ही वेळ आहे.

Sunday, January 3, 2016

साहित्यिक सबनीसांची राजकीय हाराकिरी

तीन महिन्यांपूर्वी जेंव्हा श्रीपाल सबनीस यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. कोण हे सबनीस ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. कारण मराठवाड्यातले सबनीस पुण्यामुंबईच्या साहित्य वर्तुळात  फारसे कोणाला माहितच नव्हते. त्यामुळे त्यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड म्हणजे सगळ्यांनाच एक आश्चर्याचा धक्का होता.  पण, अलीकडच्या काळात साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचे राजकारण  प्रत्यक्ष  राजकारणापेक्षा भयानक झाले आहे. जो या राजकारणात सरस ठरतो तोच निवडून येतो, म्हणूनच सबनीस हे या पदावर निवडूण आले असावेत असे म्हणावे लागेल. सबनीसांचे साहित्यिक कर्तृत्व काय? असा प्रश्न त्यामुळेच विचारला जाऊ लागला . 

निवड झाल्या नंतर त्यानी मराठीतील मोठ्या विद्वांनांनी त्यांच्या लेखनाविषयी काढलेल्या गौरवोद्गारांचा सोशल मिडियाद्वारे प्रसार करत मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला.  य. दि फडके, श्रीराम लागू यांच्यासारखे दिग्गज त्यांच्या लेखनाबद्दल चार चांगले शब्द बोलतात म्हणजे माणूस ताकदीचा असावा,असे माझ्यासारख्याना वाटले. पण मराठवाड्यातील असल्यामुळे कदाचित दूर्लक्षित राहिला असण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांना संशयाचा फायदा द्यायला अनेकजण तयार झाले. किस्त्रीमच्या  दिवाळी अंकात सबनीस यांनी लिहलेल्या लेखात मोदी  कट्टरतावादाकडून उदारमतवादाकडे चालले आहेत अशी मांडणी केली.  या लेखामुळे सबनीसांच्या विचारांची दिशा स्पष्ट होते. कोणत्याही विचारांतील मतभेदांचे मुद्दे बाजूला सारून  समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे, त्यातच सगळ्यांचे हीत आहे. असा  विचार मांडताना ते दिसले यावेळी ही लोक सोशल मिडीयावरून त्यांची टर उडवत होते, पण हा माणूस काही तरी वेगळे मांडतोय असे चित्र त्यांनी केले. राजकीय अस्पृश्येतेच्या भिंती बाजूला सारून विरोधी विचारांना ही समजून घेण्याचा प्रयत्न करणे यात काही गैर नव्हते, विचारसरणींचे मठ निर्माण करून आपल्याशी मतभेद असणार्यांकडे तुच्छतेने पाहणार्यांना सबनीसांची मांडणी उत्तर असू शकते असेही काहीना वाटले. 

पण त्यानंतर सबनीसांनी वाद ओढवून घेण्याचा सपाटाच लावला. मोदींच्या बाजूने सकारात्मक मांडणी केल्यामुळे त्यांना  वैचारिकदृष्ट्या बहिष्कृत होण्याची भिती वाटलेली दिसते. कदाचित म्हणूनच त्यानंतर वैचारीक कसरत करताना  त्यांच्या बोलण्यामध्ये सातत्य दिसले नाही. कधी ते असहिष्णूतेचा बागुलबुवा उभा करणार्या अवार्ड वापसी गँगला पाठींबा देताना दिसतात, तर कधी मोदींना पंचशील तत्त्वाचे पुरस्कर्ते मानतात. अचानक मिळालेल्या प्रसिध्दीमुळे त्याची सवय नसलेले सबनीस वाहवत गेल्यासारखे वाटतात.

 त्यानंतरच्या प्रत्येक भाषणामध्ये काहीतरी वादग्रस्त मुद्दा उपस्थित करुन मथळे मिळवण्याची धडपड हा माणूस करतोय की  काय असे वाटू लागले. नुकत्याच  आकुर्डी येथे झालेल्या युवा साहित्य संमेलनामध्ये त्यांनी मोदींबाबत केलेले वक्तव्य या सगळ्यावर कडी करणारे ठरले. वास्तविक पाहता नरेंद्र मोदींबाबत सबनीसांचे धोरण मवाळ दिसते. मोदी आता पूर्वीचे राहिले नाहीत हा त्यांचा थिसीस आहे.  गुजरात दंगली वेळचे मोदी आणि आत्ताचे मोदी यामध्ये फरक आहे. आत्ता मोदी गांधी आणि बुध्दाची भाषा बोलत आहेत असे त्यांना म्हणायचे होते. पण तो थिसीस पटवून देण्यासाठी त्यांनी जी काही भाषा वापरली त्यावरून एकंदर साहित्य आणि साहित्यिक यांच्यापासूनच लोकांनी दूर राहणे पसंत करावे. आपला मुद्दा पटवण्यासाठी त्यांनी जो काही द्रविडी प्राणायाम करायचा प्रयत्न केला त्यात ते पुरते अडकले आहेत.

 गुजरातचे मोदी माझ्यासाठी कलंकीत आहेत असे बोलताना त्यांचा पाकीस्तान दौरा म्हणजे मरायचे लक्षण होते. त्यांच्यावर हल्ला होऊ शकला असता आणि मंगेश पा़डगावकरांच्याआधी आपल्याला मोदींची शोकसभा घ्यावी लागली असती असे ते बोलुन गेले आणि अपेक्षेप्रमाणे एकच गदारोळ उठला. वाद ओढवून घेऊन प्रसिध्दी मिळवण्याच्या नादात सबनीस न घर का ना घाट का असे झाल्याचे दिसते. सबनीसांचा माध्यमांशी संबंध गेल्या दोन तीन महिन्यातीलच आहे. प्रसिध्दी कशी काम करते हे त्यांना नव्यानेच कळले असावे, वाद निर्माण करुन नामानिराळे राहण्याचा त्यांना हातखंड़ा असणारे लोक निदान कोणती तरी बाजू घेताना आपल्या बाजूने काही  लोक राहतील अशी व्यावहारिक दक्षता घेतात. पण या प्रांतात नवखे असलेले सबनीस गोंधळून गेलेले  दिसतात. त्यांच्या नंतरच्या वक्तव्यावरून  सबनीस नेमके कुठल्या बाजूला आहेत हेच कळत नाही त्यामुळे सबनीसांच्या बचावासाठी सोशल मिडियामध्ये कुठलीही फौज उतरणार नाही हे उघड आहे. त्यामुळे सबनीसांचे हे वागणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण होण्याचीच चिन्हे आहेत. 

 सबनीसांचे सध्याचे वागणे तरी हुरळली मेंढी या म्हणीची आठवण करून देणारे आहे. त्यामुळे  येत्या 15 तारखेपासून पिंपरी चिंचवडमध्ये होणारे चार दिवसाचे साहित्य संमेलन एकंदरीत वादग्रस्त होण्याची चिन्हे आहेत. वाद ओढवून घेऊन संमेलनाची आणि स्वतःची प्रसिद्घी करण्याचा सबनीस यांचा डाव असेल तर ते त्यात यशस्वी झाले आहेत. पण काही वेळेला स्थिती आपल्या नियंत्रणात राहत नाही,  याचे सबनीस आणि संमेलनाच्या आयोजकांनी भान ठेवलेले बरे...