Showing posts with label intelectuals. Show all posts
Showing posts with label intelectuals. Show all posts

Wednesday, September 6, 2017

मरणारे ... मारणारे आणि अजेन्डा चालवणारे

कोणत्याही खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्या गुन्ह्याचे खरे लाभार्थी कोण हे पाहणे  तपास यंत्रणांना गरजेचे असते.   साधारणपणे  खून झालेल्या व्यक्तीचे  उघड भांडण असलेल्या  व्यक्तीवर स्वाभाविक संशय जात असतो.  पण तसा संशय जावा केवळ याच हेतूने  कुणीतरी दुसऱ्यानेच गुन्हा केल्याचे  अनेकदा तपासात निष्पन्न होत असते.  त्यामुळे त्या व्यक्तीशी उघड वाद असणारे  याना संशयित म्हणून पहिले पाहिजेच.  पण त्याबरोबरच हत्येचे  भांडवल करून अजेंडा चालवणारे यांनाही सारखेच संशयाने पाहिले गेले पाहिजे.  कारण वैचारिक विरोधक असलेल्या लेखक, विचारवंत,पत्रकाराला  संपवणे हा जसा गुन्ह्याचा मोटिव्ह असू शकतो. तसा हत्येचे भांडवल करून स्वाभाविक संशयितांना मुख्यत्वे तटस्थ असलेल्या जनतेच्या नजरेतून उतरवणे आणि आपले  राजकारण चमकवणे  असा हेतू नाकारता येत नाही.

 विचारवंतांचे खून जसे त्यांचे उघड वैचारिक विरोधक करू शकतात,  तसेच, अशा  हत्येचे राजकीय भांडवल करून  त्यावर आपला राजकीय अजेन्डा चालवण्याची निकड असणारेही करू शकतात.  २००८ च्या मुंबई हल्ल्यात हल्लेखोर हिंदू वाटावेत याची पूर्ण खबरदारी अतिरेकी संघटनांनी घेतली होती. कोणताही हल्लेखोर जिवंत सापडणार नाही याची त्यांना खात्री असावी पण अजमल कसाब जिवंत सापडला आणि या हल्ल्यामागचे खरे सूत्रधार उघड झाले. तसे झाले नसते तर हा हल्ला तथाकथित हिंदू दहशतवाद्यांच्या नावावर खपला असता.  हिंदुत्ववाद्यांना वैचारिक विरोध करणाऱ्या  विचारवंतांच्या हत्या हिंदुत्ववादी राजकारणाला अडचणीत आणत आहेत हे उघड आहे.  मग प्रश्न असा पडतो कि आपल्या वैचारिक विरोधकांना टप्प्याटप्प्याने हुतात्मे पुरवल्याने  स्वतः बद्दलची जनमानसातील सहानुभूती संपत आहे एवढ  साधं  गणित  हिंदुत्ववाद्याना कळत नसेल?
एक म्हणजे अशा हत्यामुळे  जनमानसात उजव्या विचारांच्या संघटनांविषयी  चीड निर्माण होत असते.त्यांना फॅसिस्ट  म्हणून प्रोजेक्ट केले जाते  किंबहुना याच  उद्देशाने  या हत्या होत नसतील असे सांगता येत नाही.  कारण या हल्ल्याचे टार्गेट म्हणून बऱ्यापैकी ज्येष्ठ म्हणजे वडीलधारी व्यक्ती निवडली जाते. हिंदुत्ववाद्यांशी वैचारिक संघर्ष करण्याचे त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड असते.  मरणारी व्यक्ती ज्येष्ठ आणि  समाजामध्ये आदराचे स्थान असणारी असते  या तिन्ही गोष्टी असतील  तर मिळणारी सहानुभूती अधिक असते. वैचारिक वर्तुळाबाहेर म्हणजे सामान्य लोकांची सहानुभूती मिळत असते.  वृद्ध  माणसांना मारणारे किती भेकड लोक आहेत अशी तीव्र लोकभावना होत असते. आणि प्रस्थापित व्यवस्थेने  हत्या केलीय असे चित्र  निर्माण करून  विरोधकांचे दानवीकरण(demonisation )  करणे अधिक सोपे जात असते.  दुसरे म्हणजे professional  shooters  ना सुपारी देऊन अशा हत्या घडवल्या जातात.  खरे सूत्रधार सापडणारच नाहीत अशी जणूकाही खात्रीच अजेंडा चालवणार्यांना असते.  मुंबई हल्ल्याच्या आगेमागे आलेली पुस्तके हि पाताळयंत्री कारस्थाने किती नियोजनबद्ध असतात आणि समाजातले तथाकथित प्रतिष्ठित अशा कारस्थानात कसे सहभागी असतात याची साक्ष देतात.
अशा गढूळ वातावरणातं सरकारची जबाबदारी वाढत असते . देशात हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आहे आणि विचारवंतांची हत्या झाली कि संशयाची सुई  हिंदुत्ववाद्यांकडे जात असते. त्यामुळे संशयित जरी सरकारच्या विचाराशी बांधिलकी सांगणारे असले तरी त्यांचा पायबंद करणे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, कारण अशातून अराजकाला आमंत्रण मिळते  आणि त्यातून कुणाचेच दूरगामी हित नाही अगदी हिंदुत्ववाद्यांचेहि नाही .  दुसऱ्या शक्यतेनुसार  देशात नव्याने प्रस्थापित झालेल्या हिंदुत्ववाद्यांना पर्यायाने मोदी  सरकारला अडचणीत आणण्यासाठी या हत्या ठराविक अंतराने होत असतील तर. देशात हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात आक्रमक मांडणी करणाऱ्या सगळ्या विचारवंतांना  सरकारने  स्वतः  पुढाकार घेऊन सुरक्षा पुरवली पाहिजे.ते रात्रंदिवस सरकारच्या विरोधात बोलत लिहीत असले तरी त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही यासाठी जे काही करावे लागेल ते सरकारने केले पाहिजे.
विचारवंताचा जनमानसावर प्रभाव असतो हे नक्की पण आता माहितीच्या विस्फोटाच्या काळात त्यालाहि  मर्यादा  आहेत.   निवडणुकीच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याइतकी त्यांची  शक्ती नक्कीच  नाही  हे त्यांचे खंदे समर्थक हि मान्य करतील. मात्र हत्या झाल्यानंतर ते काय सांगत होते. किंवा कुणाविरोधात संघर्ष करत होते याचा मोठा गवगवा होतो. त्यांच्या विचारांचा प्रसार मृत्यूनंतर जास्त होतो. आपल्या अक्ख्या हयातीत ते जेवढ्या लोकांपर्यंत पोहचू शकले नसते तेवढे हत्या झाल्यानंतर काही तासात पोहचतात.
कोणतीही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी केडर मध्ये लढाऊबाणा कायम ठेवण्यासाठी हुतात्म्यांची गरज असते. कुठल्याही मानवी समूहात त्यांच्या पूर्वसुरींनी दिलेल्या हौतात्म्याची पोवाडे गात राहून पुढच्या पिढ्यान प्रेरणा मिळत असते. विशेषतः  परिस्थिती अनुकूल नसताना चळवळ जिवंत ठेवण्यासाठी  हौतात्म्य खूप फायदेशीर ठरते.  विचारांची लढाई लढत लढत त्यांनी  केलेले बलिदान लढ्याला नवी संजीवनी देत असते. हे गेल्या चार वर्षात झालेल्या चार विचारवंतांच्या हत्यानंतर वारंवार  स्पष्ट झालेय. मग जे एखाद्या मतदारसंघही प्रभावित करू शकत नाहीत अशा विचारवंतांच्या हत्या करून त्यांच्या वैचारिक विरोधकांना काय मिळणार हा प्रश्न आहे. झाला तर तोटाच होतो, त्यांना बचावात्मक पवित्र्यात जावे लागते.  या वैचारिक लढाईशी काहीही देणेघेणे नसणारे सामान्य मतदार अशा हिंसेमुळे दुरावण्याचा धोका असतो. असा धोका ते का बरे पत्करतील.  हा झाला राजकीय फायद्यातोट्याचा हिशेब.

एक गोष्ट स्पष्ट आहे भारतीय जनमानसाला खूनखराबा आवडत नाही. तो धर्मयुद्धाच्या नावे  असो कि लाल क्रांतीच्या.  पण डाव्या  लोकांचा हिंसेला तेंव्हाच विरोध असतो तेव्हा जो प्रतिस्पर्धी राजकीय शक्तींकडून होतो. हिंसेत अडकलेला कुणी आपला बिरादरीतला असेल तर एक तर त्याला त्यात कुणीतरी अडकवलय असा जाहीर बचाव केला जातो. पण ते वैचारिक वर्तुळाबाहेरच्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी  असते. प्रत्यक्षात मात्र डाव्यांची हिंसेला अधिकृत मान्यता असते.  भारतीय जनमानस भोळे आहे. मरणारा कुणीही असला अगदी वैरी जरी असला तरी ते हळवे होत असते. हिंसेच्या मार्गाने जाणाऱ्याविषयी त्यांना घृणा असते.  पण याच भारतीय वृत्तीचा वापर करून लोकप्रियतेचा लंबक दुसऱ्या बाजूला झुकण्यासाठीचा हा खटाटोप तर नसेल?  अशी शंका घ्यायला जागा आहे.

अशी शंका येणाची दोन कारणे आहेत.  देशात नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर  तथाकथित असहिष्णुतेचा गवगवा करून लेखक, विचारवंत  या सरकारच्या विरोधात आहेत असे चित्र निर्माण करून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला. पण त्याला यश येत नाही असे दिसल्यावर हे सरकार विरोधातला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असे सिद्धांत मांडले गेले. आणि ते सिद्धांत खरे ठरवण्यासाठी लेखक विचारवंतांना त्यामध्ये बळीचे बकरे तर बनवले जात नाही.  तसे असेल तर हा एक व्यापक समन्वयातून घडवून आणलेला राष्ट्रव्यापी कार्यक्रम आहे.  ज्या विचारवंतांनी त्यांचे बहुतांश योगदान आधीच दिले आहे.  त्यांच्या जीवित असण्याने फार  मोठा फरक प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला पडणार नव्हता.  पण त्यांच्या हत्येने त्यांची प्रतिमा डागाळली जाते आहे.  त्यामुळे अशा हत्यामधून आपण लोकांची सहानुभूती गमावतो आणि झालाच तर तोटाच होतो. मग असा घाट्याचा सौदा स्वतःला ' व्यापारी का बेटा' म्हणवून घेणारे सत्ताधारी कशाला करतील.  पण हे रोखण्यामध्ये त्यांना सत्ताधारी म्हणून अपयश येत आहे. हेहि तितकेच खरे आहे

Sunday, October 18, 2015

हा तर रडीचा डाव

लहानपणी वाचलेली गोष्ट आठवते, एका माणसाला  कुणीतरी सिद्ध पुरूष भेटतो. तो सिद्घपुरूषाला  विचारतो मी कधी मरणार आहे.  सिद्ध पुरूष म्हणतो की जो जन्माला आलाय तो कधी तरी मरणारच . त्या माणसाचे समाधान या उत्तराने होत नाही. तो  म्हणतो की नाही मला हे कळलेच पाहिजे की मी कधी मरणार ते. त्याच्या दूराग्रहामूळे  साधूचा नाईलाज होतो, आणि वेळ मारून नेण्यासाठी तो त्याला एक ताबीज देतो. आणि सांगतो हा ताबीज जो पर्यंत आहे तो पर्यंत तू जिवंत, तूटला की तुझ्या आयुष्याची दोरही तुटली म्हणून समज.  त्या दिवसापासून  तो ताबीज खूप जपतो. आणि त्या ताबीजात त्याचा जीव आहे ही कल्पना त्याच्या मनाची जबरदस्त पकड घेते आणि तो त्याच भ्रमात जगत राहतो. कालांतराने ताबीजाचा दोरा जूना होतो आणि  तुटतो.  तो माणूस समजतो की ताबीज तुटलाय म्हणजे तो जीवंत नाही. लोक त्याला सांगतात की तू मेलेला नाहीस जीवंत आहेस, पण  तो  लोकांवर त्याचा विश्वास बसत नाही.  जगण्या मरण्याचे एक विज्ञान असते पण त्याला तो प्रतिकात्मक ताबीज  विज्ञानापेक्षा मोठा वाटत असतो. तो तुटलाय म्हणजे मी जीवंत असणे शक्य नाही  असे समजून स्वतःच कबर खोदतो आणि स्वतःच त्यात झोकून देतो.  गोष्टीचे तात्पर्य काय एखाद्या माणसाच्या मनावर एखादी गोष्ट कोरली की त्याची एक वेगळीच मानसिक अवस्था तयार होते आणि त्यावर काही ईलाज नसतो.

अशीच काहीशी अवस्था आपल्या देशातल्या  लेखक आणि विचारवंतांच्या एका मोठ्या गटाची झाली आहे असे त्यांच्या अलिकडच्या वागण्यावरून वाटते.  त्यांच्यादृष्टीने कॉंग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांचा एकमेव पाठीराखा होता कॉंग्रेस सत्तेवर नसणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा  विचार (धर्म) बूडाला अशी त्यांची समजूत झाली आहे. कारण त्या माणसाला जसे ताबीजाचे महत्त्व होते तसेच यांना तोंडदेखले धर्मनिरपेक्ष असलेल्या पक्षांचे. मग कॉंग्रेसप्रणीत सरकारांच्या सगळ्याच कृती त्यांच्यासाठी  आपोआप धर्मनिरपेक्ष होऊन जातात. त्यामुळे हा ताबीज  तुटला म्हणजे त्यांनी  आयुष्यभर जपलेली मूल्ये कायमची संपली असे त्यांना वाटू लागलेय.  याच भयाने त्यांना खूप आधीपासून ग्रासले आहे. नरेंद्र  मोदी सत्तेवर येईल तो देशासाठी काळा दिवस असेल अशी विधाने करून त्यांच्यापैकी काहींनी आधीपासूनच आपल्या पराभूत आणि भयभित मानसिकतेचे दर्शन घडवायला सुरुवात केली होती.  त्यांच्या अशा वागण्यांने  मोदीं आणि त्यांच्या पक्षाचा मार्ग सोपा करून ठेवला होता. असे करून त्यांनी  स्वतःच्या विचारांची कबर स्वतःच खणायला घेतली होती. त्यांना मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेपर्यंत जावू शकतो याची जाणीव सगळ्यांच्या आधी झाली होती. त्यामुळे गेल्या तेरा वर्षापासून सातत्याना आक्रस्ताळी मोदी विरोध सुरू होता. त्यामुळेच कोणाच्या ध्यानीमनी नसताना आपसुकच मोदी देशाच्या राजकारणात मध्यवर्ती स्थानी आले.

 मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशात अमुक अमुक गोष्टी होणार असे त्यांच्या मनात पक्के ठसले होते. तशी नजर आधीच तयार असल्यामुळे त्यांनी त्या चिकित्सक नजरेतून घडामोडींकडे नव्याने पहायला सुरूवात केली. आधीच्या सरकारच्या काळात त्यांना तसे पाहण्याची आवश्यकता वाटत नव्हती. कारण त्यांच्या हातात धर्मनिरपेक्षता सुरक्षित होती  कारण धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत होते म्हणजे ताबीज सुरक्षित होता.  माणसाच्या मनाची ताकद जबरदस्त असते, मनात उभारी असेल आत्मविश्वास असतो आणि परिस्थितीशी सामना करण्याची धमक असते. पण उलट स्थिती असेल तर माणूस भयग्रस्त होतो. आणि भयभित होण्यासाठी कारणे शोधतो. त्यामुळेच  गेल्या दिड वर्षापासून या देशात अनेकांचा श्वास गुदमरायला लागला. कारण ताबीज तुटला की सगळं संपलं हे ठरलेलं होतं.  हे गुदमरलेपण जगजाहीर  करण्यासाठी त्यांना अनेक घटना घडत गेल्या. कारण सर्व धर्मांच्या आणि विचारांच्या अतिरेकी वृत्तीना आपल्या देशात फ्री हॅंन्ड देण्यात आला आहे. इतका की त्यांनी लोकशाही व्यवस्था हायजॅकच केली आहे. त्यामुळे त्यांच्यात सतत  टकराव सुरू आहे. त्यातून सातत्याने हिंसक घटना घडत आहेत. पण प्रत्येकाला दूसऱ्याबाजूने झालेली हिंसा जितकी गंभीर वाटते तितकी आपल्या बाजूची वाटत नाही. त्यामुळेआपल्यावरच सगळ्यात जास्त अन्याय होतोय हे दाखवण्याची स्पर्धा लागली आहे. आणि तो अन्याय मोठा आणि अतिरंजीत करून सांगण्याची चढाओढ लागली आहे. त्यातून  अनेक ठिकाणी अन्यायाचा प्रतिकार म्हणून हिंसक घटनांचे  निर्लज्ज समर्थन होत असताना आपण पाहतो.

 विरोधी विचारांचे सरकार सत्तेत  असल्यावर असे प्रकार वाढावेत जेणेकरून त्याचे राजकारण करता येईल अशी गिधाडी वृत्ती आपल्या देशात खूप वाढली आहे. अशा  गिधाडांच्या सुदैवाने आणि देशाच्या दूर्दैवाने असे मुद्दे  सरकार पक्षाकडून आयतेच उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे  पराभूत झालेल्या राजकीय पक्षांनी सरकारविरोधी माहोल तयार करायला सुरूवात केली. पण ते  लोकांसमोर आधीच  उघडे पडल्याने त्यांच्या विश्वासार्हतेचा मोठाच प्रश्न होता. हवा तसा माहोल तयार होत नाही असे लक्षात आल्यानंतर   सरकारविरोधातला हा आवाज अॅम्फ्लिफाय करण्यासाठी  लेखक विचारवंतांना आखाड्यात ओढले गेले. . खरे तर अशाप्रकारे माहोल तयार करण्याचे  एक तंत्र आपल्या देशात विकसीत होत आहे. त्यामध्ये मानवी स्वभावाचा खुबीने वापर करण्यात येतो. सामान्य माणूस खोलात जावून विचार करत नाही, समाजातल्या मान्यवर लोकांच्या विचारानी तो प्रभावित होत असतो.  त्यामुळे विचारवंतानी  लोकप्रिय धारणेपेक्षा वेगळा सूर लावला की लोकांना आपलेच चुकलेच असे वाटण्याची शक्यता असते त्या गृहितकावर सध्याचे विचारवंतांचे बंड उभे राहिले आहे. पण आताच्या भारतीय समाजावर कुठल्याही विचारांचा कितपत प्रभाव आहे हा संशोधनाचा विषय आहे.

खरे तर जगाच्या  आणि देशाच्या इतिहासात अनेक लेखक आणि विचारवंत क्रांतीचे अग्रदूत ठरले होते. त्यांनी कुठला तरी विचार मांडावा आणि जनतेने तो उचलून धरावा आणि त्यांच्या मागे जावे अशी असंख्य उदाहरणे आहेत. पण आताची परिस्थिती वेगळी आहे, कोणताही विचाराची तितकी मोहिनी लोकांवर पडत नाही. वाचता येणाऱ्यांचे प्रमाण हजारो पटीने वाढले असतानाही ही परिस्थिती आहे हे विशेष. याचा अर्थ एक तर असा होतो की आजकालच्या विचारांमध्ये   जनतेला आकर्षित करण्याची ताकद नाही ताकद नाही किंवा जनताच कुचकामी आणि नालायक झाली आहे. तसे नसते तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर विचारवंत  आणि लोकशाही मूल्यांचे रखवालदार खडे  असताना. त्यांच्यामागे सर्वप्रकारची सरकारी  आर्थिक, ऱाजकीय, वैचारिक  ताकद उभी असताना जनतेने त्यांना हुलकावणी देत हुकुमशाही, जीर्णमतवादी, पुनुरूज्जीवनवादी, फॅसिस्ट लोकांचा पर्याय का निवडावा हा प्रश्नच आहे.  या प्रश्नाची प्रामाणिक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर त्याचा उलगडा होऊ शकतो पण त्यांना ती शोधण्यात काही स्वारस्य दिसत नाही. या बदलाचे एक कारण हे असू शकते की की लोकशाही मूल्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हे  रखवालदार कुठल्यातरी दुसऱ्याच कामात गुंतलेले  होते  किंवा त्यांना डुलकी लागली होती. त्यावेळी त्यांच्या  फॅसिस्ट उंट त्यांच्या तंबूत घुसला.  त्यांना आलेली ही ग्लानी मान्य करून त्यांनी  खडबडून जागे झाले पाहिजे होते. आपल्या उध्वस्त तंबू परत उभा करण्यासाठी अगदी सुरूवातीपासून  जुळवाजुळव करायला पाहिजे होती. पण तसा कोणताही प्रयत्न करण्याऐवजी  उंटाच्या नावाने शिव्याशाप देण्याचा मार्ग त्यांनी निवडला आहे. त्या बरोबरीने  उंटाच्या प्रेमात पडलेल्यांना नालायक ठरवण्याची यांना घाई झाली आहे.


 विचारवंतांच्या मूल्यनिष्ठा प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही, पण त्यांच्या या मूल्यनिष्ठांचा राजकारणाचा एक मोहरा म्हणून वापर होतोय. अशा वापरामूळे तात्पूरता माहोल तयार होईलही, पण त्यांना अभिप्रेत असलेली मूल्ये रूजवण्यासाठी त्याचा उपयोग होणार ऩाही. उलट विचारवंतांनी आयुष्यभर कमावलेली प्रतिष्ठा (पुण्य)पणाला लागले आहे.  कारण कधी नव्हे एवढा विरोधाचा आणि टीकेचा सूर या बंडांच्याबाबतीत समाजातून उमटला आहे. विरोध सूरात बोलणाऱ्याना मोदी भक्त म्हणून हेटाळणी केल्याने मोदी भक्तांना काही फरक पडणार नाही. उलट मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी हे घडवून आणलेले बंड आहे या सरकाच्या आरोपांना पुष्टीच मिळेल. याचा सरकारवर आणि लोकांवर अपेक्षित परिणाम झाला नाही तर   सगळ्यात जास्त धक्का विचारवंतांच्या समाजातील प्रतिमेला बसणार आहे. कारण हे शस्त्र कायमचे निकामी होऊन जाणार आहे.

मूळात हिंदूत्ववादी सरकार सत्तेवर येणे हाच धर्मनिरपेक्षतेचा पराभव आहे असे  मानणे चुकीचे  आहे  आपल्या  विचारांना या देशात स्थान नाही असे मानून सैरभर होणे म्हणजे पराभूत आणि भयग्रस्त मानसिकतचे लक्षण आहे. हा पराभव विचारांचा नसून लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत विचारांना  आपल्याला पाहिजे तसे वाकवून केलेल्या सत्तालोलूप राजकारणाचा, आणि लोकांना गृहित धरून त्यांच्याच आशाआकांक्षाचा बळी देणार्या वृत्तीचा आहे. मूळ समस्या दूर झाल्याशिवाय ग्लानीत गेलेल्या विचारांची पुनर्स्थापना होण्यासाठी हे बंड उपयुक्त ठरणार नाही. तस्लिमा नसरीनची भारतीय धर्मनिरपेक्षतेवरील टीप्पण्णी काय चुकलेय हे समजून घेण्यासाठी ऊपयुक्त ठरेल.